नानिवडे : रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे नानिवडे (ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील शोभना नारायण विद्यालयाला तीन हजार रुपयांची पुस्तके, राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा आणि चरित्र पुस्तके देण्यात आली. संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी पाच हजार रुपयांची देणगी प्रदान केली.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर म्हणाले, ‘संघाची स्थापना १९२८मध्ये झाली. आता शतकाकडे वाटचाल करत आहोत. संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. शोभना नारायण हायस्कूल हे कऱ्हाडे ज्ञातीमार्फत चालवले जाणारे एकमेव हायस्कूल आहे. विंग कमांडर मोरेश्वर नानिवडेकर यांच्या स्मरणार्थ विश्राम नानिवडेकर यांच्या देणगीतून प्रथमच पुस्तके देण्यात आली आहेत. दर वर्षी यात वाढ करून शाळांना दहा हजार रुपयांपर्यंतची पुस्तके देण्याचा मानस आहे. यापूर्वी राणी लक्ष्मीबाई जयंती कार्यक्रम कोट आणि कशेळी येथे साजरा करण्यात आला होता.’
कार्यक्रमाला सिंधुदुर्ग कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष प्रदीप जोशी, सोमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक शरच्चंद्र नानिवडेकर, अध्यक्ष सीमा नानिवडेकर, सचिव दत्तात्रय नानिवडेकर, मुख्याध्यापक शिरीष शेंबवणेकर, मनोहर महाजन, शोभा तांबे, नीलम जोशी, सीताराम के. गुर्जर, रत्नागिरी कऱ्हाडे संघाच्या सचिव शिल्पा पळसुले-देसाई, प्रतिभा प्रभुदेसाई, सुहास ठाकुरदेसाई, उदय काजरेकर, समीर नानिवडेकर, वंदना नानिवडेकर, नीलम हिर्लेकर, नारायण नानिवडेकर, भास्कर हिर्लेकर, दत्ताराम फेफडे, डॉ. शरद प्रभुदेसाई आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे आणि सिंधुदुर्ग कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष प्रदीप जोशी म्हणाले, ‘रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंचा आदर्श विद्यार्थिनींनी घ्यावा. कोकणाने अनेक भारतरत्न, शास्त्रज्ञ, कलाकार दिले आहेत. प्रभू श्री रामाचा आदर्शवाद व श्रीकृष्णाचा व्यवहारवाद यांची सांगड घालून विद्यार्थ्यांनी पदवी मिळवावी. त्यानंतर तुम्हाला कर्तृत्व व नेतृत्वाचीही संधी मिळेल. जे स्वप्न बघाल ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.’
या निमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थिनींसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील १०० मी. धावणे व उंच उडी प्रकारात सेजल वाडेकर, २०० मीट धावणे, लांब उडी आणि गोळा फेक या प्रकारांत संचिता साळवी, ४०० मी. धावणे या प्रकारात श्रुती साळवी, थाळी फेक प्रकारात खुशी कुडकर तर कॅरममध्ये सोमेश्वरी भोसले या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावले. या वेळी विद्यार्थिनींनी राणी लक्ष्मीबाईंविषयी भाषणे केली.
विद्या गुर्जर म्हणाल्या, ‘विंग कमांडर भावाच्या स्मरणार्थ आणखीही काही मदत कऱ्हाडे ब्राह्मण संघासाठी करणार आहोत. त्याला वाचन, संगीत व सर्व विषयांची आवड असल्याने पंडित म्हणत. भाऊ दहावी परीक्षेतही बोर्डात आला होता.’
सोमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक शरच्चंद्र नानिवडेकर यांनी सांगितले, ‘राणी लक्ष्मीबाई जयंती दर वर्षी शाळेत साजरी केली जाईल. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करू. ज्येष्ठांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल.’
सीमा नानिवडेकर म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांनी निश्चय करावा. स्वतःची प्रतिमा बनवा. राणी लक्ष्माबाईंचा आदर्श घेऊन गुण आत्मसात करा. यश नक्की मिळेल.’
मुख्याध्यापक शिरीष शेंबवणेकर यांनी शाळा स्थापनेपासूनचे अनेकविध अनुभव सांगितले. ‘कोकण प्रज्ञा शोध परीक्षेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. सुरुवातीला ९५ विद्यार्थी शिकत होते. दहावीचा निकाल १०० टक्के लागतो व प्रत्येक विद्यार्थी ९० ते ९२ टक्के गुण मिळवतो. विद्यार्थी पुस्तके वाचतात आणि नेमके काय वाचले त्याचा अभिप्रायही लिहितात. दहावीच्या बॅचसाठी डिसेंबर ते मार्च या कालावधीत रात्र अभ्यास वर्ग चालवला जातो,’ अशी माहिती त्यांनी दिली.
सूत्रसंचालन एन. एस. जाधव यांनी केले. आभार डी. एस. भोसले यांनी मानले.